पुणे -प्रतिनिधी
मुंबईच्या मालाड परिसरात नफ्यासाठी जीवघेणा प्रकार उघडकीस आला असून, एका फळ विक्रेत्याने उंदरांपासून फळे (Fruits) वाचवण्याच्या नावाखाली चक्क ‘रॅटोल’ ही विषारी क्रीम फळांच्या सालीवर लावल्याचे समोर आले आहे. रात्री उंदीर फळे कुरतडून आर्थिक नुकसान करत असल्याने असमजूतपणे हा बेजबाबदार उपाय अवलंबला गेला. नागरिकांनी विक्रेत्याला रंगेहाथ पकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.(Malad Crime News)
‘रॅटोल’सारख्या घातक रसायनामुळे तीव्र पोटदुखी, उलटी, विषबाधा होऊ शकते तर यकृताला कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका निर्माण होतो, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. सफरचंद, डाळिंबांसारख्या महागड्या फळांवर हे विष लावले जात असल्याचे व्हिडिओत दिसते.
घाईघाईत रस्त्यावरून फळे खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, मालाड पोलिसांनी दोन परप्रांतीय विक्रेत्यांना अटक केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनीही या विक्रेत्यांना चांगलाच दणका दिला. या घटनेमुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
