पुणे -प्रतिनिधी
सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्यातील तब्बल १९ शेतकऱ्यांनी आपली किडनी विकावी लागल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत समोर आली आहे.(Kidney Sale Case ) चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत ही प्रकरणे प्रामुख्याने उघडकीस आली असून, गृह विभागाने आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हे वास्तव मांडले.तपासात सोलापूरमधील (Solapur) एका मध्यस्थाचा पर्दाफाश झाला. या व्यक्तीने स्वतःची किडनी ८ लाख रुपयांना विकली आणि नंतर इतर १६ जणांना या किडनी रॅकेटमध्ये ओढले.
आतापर्यंत ११ आरोपींचा उलगडा झाला असून, त्यापैकी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, हे व्यवहार आंतरराष्ट्रीय रॅकेटशी जोडलेले असून, किडन्या कंबोडियासारख्या देशांतील रुग्णालयांत विकल्या जात आहेत.चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील नागभीडमधील शेतकरी रोशन कुडे यांची कहाणी यातील सर्वांत विदारक आहे. त्याने सावकाराकडून फक्त १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजाच्या दबावाने ते ४८.५३ लाख रुपये आणि १ एकर जमीनपर्यंत पोहोचले तरी तगादा थांबला नाही. शेवटी कर्जमुक्तीसाठी त्याला परदेशात जाऊन किडनी विकावी लागली. विधानसभेत नितीन राऊत, अतुल भातखळकरसह अनेक आमदारांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
