पुणे -प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील गोनवडी (Gonavdi) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय)(ITI Hostel) मुलांच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना समोर आल्यानंतर आयटीआय परिसरासह संपूर्ण आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, वसतिगृहातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मृत विद्यार्थ्याचे नाव सौरभ संतोष साखरे (Saurabh Sakhare) (वय २३) असे असून तो आयटीआयच्या वसतिगृहातच वास्तव्यास होता. उन्हाळ्यातील उकाड्यामुळे सौरभ हा गुरुवारी रात्री वसतिगृहाच्या टेरेसवर झोपला होता. पहाटेच्या सुमारास याच ठिकाणी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी ऋषिकेश लक्ष्मण बढेकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार, अमय भिका कोकरे (Amay Kokare) (वय १९) याने जुन्या वादातून आणि अनिरुद्ध साखरे याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून सौरभवर हल्ला केल्याचा आरोप आहे. हा प्रकार ४ जूनच्या रात्रीपासून ५ जूनच्या पहाटेदरम्यान घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.(StudentMurder)
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, आरोपी अमय कोकरे याने लोखंडी पाईप आणि सिमेंटच्या गट्ट्याने सौरभच्या डोक्यावर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने सौरभ जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुरावे जप्त करून तपासाला सुरुवात केली.
या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात अमय कोकरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(PuneDistrict) सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, नेमका वाद कशामुळे चिघळला, भांडणाची पार्श्वभूमी आणि इतरांचा यात काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात घडलेल्या या घटनेमुळे पालक आणि स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, आयटीआय वसतिगृहातील सुरक्षा आणि देखरेख अधिक कडक करण्याची मागणीही पुढे येत आहे.
